Monday, July 9, 2012

दीपक घारे यांनी 'ललित'मध्ये लिहिलेले 'कुहू'चे सविस्तर परीक्षण


पहिली भारतीय मल्टीमीडिया कादंबरी म्हणून 'कुहू'बद्दल बरीच चर्चा झाली. चित्रं, छायाचित्रं, व्हिडिओ, अ‍ॅनिमेशन, संगीत आणि अर्थातच शब्द यांनी बनलेली ही कलाकृती आहे. त्याला साहित्यकृती म्हणत नाही, कारण त्यात सीडीसारख्या दृकश्राव्य माध्यमाचा वापरही केलेला आहे. एका बाजूला शब्दांबरोबरच रंगसंवेदनांचा अनुभव देणारं चित्ररूप पुस्तक तर दुसर्‍या बाजूला चित्रांबरोबरच गाण्यांचा समावेश असलेली सीडी अशा दुहेरी माध्यमातून 'कुहू' आकाराला आलेली आहे. या पुस्तकाच्या लेखिका कविता महाजन यांनी मनोगतात म्हटलं आहे की, 'कुहू' ही एका नव्या प्रयोगाची सुरुवात आहे. अनेक क्षेत्रांमधली मंडळी आपापल्या तर्‍हेनं यात सहभागी झाली, तसेच वाचकही सहभागी व्हावेत आणि शक्यतांच्या नव्या वाटा तयार व्हाव्यात असं त्यांना वाटतं.
कविता महाजन यांच्या नावातच कविता आहे. या काव्यात्म वृत्तीबरोबरच 'ब्र' किंवा 'भिन्न' सारख्या त्यांच्या कादंबर्‍यांमधून एक सामाजिक भानही प्रकर्षाने जाणवतं. चित्रकला ही त्यांच्या वृत्तीत कवितेइतकीच मुरलेली आहे याचा प्रत्यय 'कुहू'चं पान न पान पाहताना येतो. एका वेगळया वाटेने जाण्याचं धाडस त्यांनी दाखवलं आणि ते लेखन आणि संकल्पन एवढ्यापुरतंच मर्यादित न ठेवता स्वत:च्या हिमतीवर ते प्रकाशित केलं हे महत्त्वाचं. त्याचं स्वागतच करायला हवं.
मात्र अशा प्रयोगांचं प्रयोगमूल्य आणि एक कलाकृती म्हणून असलेली त्यांची क्षमता यांचंही मूल्यमापन व्हायला हवं. नवीन प्रयोगांमागची कलात्मक अपरिहार्यता तपासून घ्यायला हवी. तसं झालं तरच 'कुहू'सारख्या प्रयोगांचं खर्‍या अर्थाने सार्थक होईल. त्यासाठी कुहूच्या विविध अंगांचा प्रथम विचार करू आणि मग त्यांच्या एकत्र परिणामाचे स्वरूप कसे आहे ते पाहू. कुहू सर्वप्रथम एक साहित्यकृती आहे. ती म्हटलं तर लहान मुलांची परीकथा आहे आणि मोठ्यांसाठी रूपककथाही आहे. रंगसंवेदना टिपणारी काव्यात्मता हा देखील तिचा एक विशेष आहे. इसापच्या कथेप्रमाणे कुहूची कथा उघड उघड तात्पर्य सांगणारी अथवा उपदेश करणारी नाही. पण आजचे पर्यावरणासारखे विषय त्यात येतात. मनुष्यस्वभावातले दोषही येतात. आणि मानवी दृष्टिकोनापेक्षा, पक्ष्यांच्या विहंगम उंचीवर जाऊन एका वेगळया परिप्रेक्ष्यातून मानवी जीवनाकडे बघता येते.
या कथेतला कुहू हा कोकिळ पक्षी आहे. सुरेल गाणारा, जंगलातल्या पशुपक्ष्यांच्या आधाराने वाढलेला. पक्षीजीवनाचा अभ्यास करायला आलेल्या मानुषी या मुलीवर प्रेम करणारा. प्रेमाखातर आपलं गाणं गमावून बसलेला आणि मानुषीकडून, माणसांकडून झिडकारला गेलेला. एका अर्थाने निसर्गापासून, निरागस प्रेमभावनेपासून दुरावत चाललेल्या मानवी समाजाच्या संवेदनशून्यतेची आणि त्यामुळे एका संवेदनशील, तरल कविहर्‍दयाची कुहूच्या रूपाने झालेली ही शोकांतिका आहे. कविता महाजन यांच्याच शब्दांत कुहूचं कथानक असं आहे.
सृष्टीने सार्‍या पशुपक्ष्यांना वेगवेगळे रंग दिले. कोकीळ आपल्या गाण्यातच मग्न होता. त्यामुळे तो सृष्टीकडे जाईपर्यंत तिच्याकडचे रंग संपले होते. शेवटी कावळा आणि कोकीळ काळेच राहिले. फक्त कोकिळाचे डोळे तिने लाल रंगवले. कोकीळ घरी आला तेव्हा कोकिळेला वाईट वाटलं. एक तर तो एकटाच सृष्टीकडे गेला होता आणि दुसरं कारण म्हणजे रंगवणं राहून गेल्याचा दोष त्याने कोकिळेच्या माथी मारला होता. कोकिळाचं संसारात काही लक्षच नव्हतं. तो गात, भटकत बसायचा आणि कोकिळा दिवसभर कामात असायची. कोकिळेला पिल्लं व्हायची वेळ आली तरी घरट्याचा पत्ता नव्हता. आत्ममग्न कोकिळाला कोकिळेला गाता येत नाही म्हणून तुच्छ वाटू लागली होती. (थोडक्यात सांगायचं तर कोकीळ पुरुषप्रधान व्यवस्थेतला आदर्श नवरा होता!)
शेवटी कोकिळेने आपलं एक अंडं कावळयाच्या घरट्यात ठेवलं आणि तिथेच कुहूचा जन्म झाला. पण कुहूच्या गोड आवाजामुळे बिंग फुटलं आणि हे पिल्लू आपलं नाही, हे कावळा-कावळीच्या लक्षात येताच त्यांची त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. फांदीवरून पडलेल्या कुहूला इतरांनी मदत केली. सरू खार, वानर डॉक्टर यांनी त्याला वाचवलं. नाजुका फुलपाखरू, घुबड आजोबा, बावरा ससा असे आणखीही काही मित्र त्याला मिळाले. कोतवाल पक्षी अंगारक याने त्याला जगण्याचे काही प्राथमिक शिक्षण दिले, भिंगार सरड्याने कुहूला जगण्याचे धडे शिकवले. या सार्‍यांनी कुहूला एक नवा आत्मविश्वास दिला. (या सार्‍या प्राणिमित्रांना लक्षात राहील असं एक वेगळं व्यक्तिमत्त्व आणि ओळख दिलेली आहे. त्यामुळे 'जंगल बुक'मधल्या मोगलीची काळजी घेणार्‍या प्राणिमित्रांची आठवण होते.)
सरू खारीबरोबर कुहू एका आंब्याच्या झाडाच्या ढोलीत राहू लागला. आता त्याच्या गळ्यातून मोकळेपणानं सूर बाहेर पडायला सुरुवात झाली. आपल्या सुरांच्या रंगीत रेशीम लडींमध्ये तो गुरफटून राहू लागला. कुहू आपल्या परीने उडायचा प्रयत्न करायचा. त्याची ती धडपड बघून कोतवाल पक्षी अंगारकाने त्याला स्वत:हून शिकवलं. सृष्टीकडे जाण्याचा प्रवास एकट्याने करू शकेल इतपत त्याची तयारी अंगारकाने करून घेतली. बेपर्वा आणि निष्ठुर कावळयांना अद्दल घडवायची असेल तर कुहूनं लवकर सगळं शिकून खंबीर झालं पाहिजे असं कोतवाल सरांचं मत होतं.
कुहू लांबच्या प्रवासाला निघाला. खूप पाहिलं. जंगलाच्या, पक्षी-प्राण्यांच्या, माणसांच्या गोष्टी ऐकल्या. अशा सगळया गोष्टींची एक मोठी लायब्ररीच त्याच्या डोक्यात तयार झाली. त्याला अनेक प्रश्न पडले. सृष्टीचं नवल मनात मावेनासं झालं. सात जंगलं, सात नद्या, सात डोंगर ओलांडल्यानंतर कुहू सृष्टीच्या चित्रशाळेत येऊन पोहोचला. सृष्टीने कुहूची सगळी हकिकत ऐकून घेतली. त्याला काय हवंय विचारलं. कुहूला त्याचं गाणं वाढवायचं होतं, पण त्यासाठी स्वत: मेहनत करायची आणि गुरूचा शोध घ्यायची त्याची तयारी होती. त्याची स्वावलंबी वृत्ती पाहून सृष्टी खूष झाली. तिने एक निळेभोर रंगीत पिस कुहूच्या डाव्या पंखात डकवलं आणि सांगितलं, "या पिसामुळे तुझं गाणं जादुई बनेल. जगातल्या ज्या कुठल्या गोष्टीचा स्पर्श या पिसाला होईल त्या साध्यासुध्या गोष्टीचंही एक सुरेल शब्दांचं गाणं होईल." कुहूचा परतीचा प्रवास फार आनंदाचा झाला, कारण निळया पिसाचा कशालाही स्पर्श झाला की त्याचं गाणं होऊ लागलं. (एखाद्या रूपककथेप्रमाणे आत्मभानाचा आदिबंधात्मक प्रवास इथे येतो.)
कुहूचं असं आनंदमय गाणं चालू असताना एक दिवस जंगलाचा अभ्यास करण्यासाठी काही तरुण माणसं आली. त्यांच्यामधलीच एक होती मानुषी. हळूहळू कुहूच्या गाण्याने मानुषीला वेड लावलं. असं गाणं तिनं कधीच कुणा पक्ष्याकडून ऐकलं नव्हतं. एकदा कुहू तिच्या दृष्टीला पडला. त्याच्या गळयावर लाल रेष होती आणि पंखांमध्ये निळं पीस होतं. कुहू मानुषीच्या रूपाने माणूस प्रथमच पाहत होता. या नव्या प्राण्याची त्याला प्रथम भीती वाटली, पण नंतर लक्षात आलं की ही माणसं जमलं तर आपल्याला मदतच करताहेत. कुहूला मानुषीबद्दल आकर्षण वाटू लागलं. प्रेमभावनेने त्याला भोवतालचं जग अधिकच सुंदर वाटू लागलं. या नात्यामध्ये अडसर होता तो भाषेचा. कुहूला माणसांची भाषा कळत नव्हती आणि मानुषीला कुहूची. मग मैनेनं कुहूला माणसांची भाषा शिकवली. त्यामुळे कुहूला मानुषीशी संवाद साधता येऊ लागला. पण भाषा आणि माणसांचं वागणं यातल्या विसंगतीचं गूढ काही त्याला उमगलं नाही. (संवादभाषा हा इथे कथेचा एक महत्त्वाचा घटक बनतो.)
मानुषीकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने कुहू उदास गाणी गाऊ लागला. इतर प्राण्यांना माणूस शत्रू वाटत होता. पण कुहूला माणसांचे दोष माहीत असूनही त्यांच्याबद्दल प्रेम वाटू लागलं. आपल्या प्रेमाने माणसांची वागणूक आपण बदलू शकू असा त्याला विश्वास वाटू लागला. आपलं माणसात रूपांतर झालं तर मानुषी आपल्या प्रेमाचा स्वीकार करेल याबद्दल त्याला खात्री होती. इतर पशुपक्ष्यांना मात्र हा वेडेपणा वाटत होता. कुहू मग सृष्टीकडे गेला. सृष्टीने त्याला माणूस बनवायचं कबूल केलं, पण एका अटीवर. माणूस होण्याच्या बदल्यात त्याला त्याचं गाणं गमवावं लागणार होतं. माणूस होण्यासाठी एवढी मोठी किंमत त्याला द्यावी लागणार होती. कुहू माणूस बनला आणि मानुषीकडे गेला. मानुषीच्या मनात जोडीदाराच्या ज्या कल्पना होत्या त्यात गाणं गमावलेला एक पक्षी कसा बसणार? कुहूचं प्रेम हा तिला एक वेडेपणाच वाटला. तिने कुहूला झिडकारलं. (कुहून परधर्मात प्रवेश केला होता. परधर्मो भयावह: हा अनुभव त्याला येणं क्रमप्राप्त होतं.)
पुन्हा पक्षी बनण्यासाठी कुहू सृष्टीकडे गेला. त्याला सृष्टीने सुनावलं की पक्ष्याचं माणूस बनणं आणि माणसाचं पक्षी बनणं हा काही पोरखेळ नव्हे. माणसाच्याच रूपात कुहूने अखेरचे दिवस काढले. गाणं त्याच्या सोबतीला शेवटपर्यंत राहिलं. त्याचा गाता गळा गेला तरी असंख्य कोकिळांच्या रूपाने ते गाणं जिवंत राहिलं. निळया पिसाच्या रूपाने मानुषीला निसर्गातून ते ऐकू येत राहिलं.
(माणसाच्या अवगुणांवर मात करणारी प्रेमभावना व्यक्त करून कुहूची कथा एक पर्यावरणीय नैतिक भूमिका घेऊन संपते.)
कुहूचं कथानक थोडक्यात असं आहे. त्यातल्या अंतर्गत सूत्रांकडे वळण्यापूर्वी या कथेतल्या पशूपक्ष्यांच्या व्यक्तिरेखांबद्दल लिहिलं पाहिजे. यातल्या घुबडआजोबांना, भिंगारसरड्याला, कोतवाल सरांना एक वेगळी ओळख आहे. घुबड आजोबा विचारी, दुसर्‍याच्या मताचा आदर करणारे आहेत. माणूस होण्याचा कुहूचा अट्टहास पाहून घुबडआजोबा विचारात पडतात. हे चांगलं की वाईट याचा निर्णय ते काळावरच सोपवतात. कोतवाल पक्ष्याचं नाव अंगारक पडलं ते त्याच्या लालबुंद डोळयांमुळे. कोतवाल सर झाले ते त्यांच्या सामाजिक शिकवणीमुळे. पक्ष्यांनी एकमेकांना मदत केली पाहिजे, कुणी संकटात असेल तर त्याला वाचवलं पाहिजे, छोट्या पिल्लांना उडणं-गाणं-कसरती असं सगळं शिकवलं पाहिजे, अशी सगळी कोतवाल  सरांची मतं आहेत. कावळयांसारख्या शत्रूंना अद्दल घडवायची असेल तर खंबीर होणं महत्त्वाचं असा त्यांचा रोखठोक आणि कृतिशील विचार आहे. भिंगार सरडा हा सुद्धा घुबड आजोबांप्रमाणे विचारी आहे पण तो माणसांकडे वाकड्या नजरेनेच पाहतो. माणसांच्या खोटेपणाबद्दल आणि मतलबीपणाबद्दल सरडा नेहमी बोलत असतो. रंग बदलणार्‍या सरड्याने माणसांचं जग जवळून पाहिलेलं आहे आणि कुहूसारखे त्याच्या मनात माणसांविषयी कसलेही गोड गैरसमज नाहीत. या आणि अशा अनेक व्यकितरेखा कुहूच्या कथेला एक वेगळा जिवंतपणा देतात. या कथेतली सृष्टी ही देवता एखाद्या धर्मनिरपेक्ष देवतेसारखी (सेक्युलर गॉडेस) आहे. तिला घुबड आजोबा, भिंगार सरड्यासारखा स्वत:चा चेहरा नाही. तिचं अस्तित्व मात्र निसर्गाच्या प्रत्येक घटकात जाणवत राहतं. सृष्टीच्या या कथेतील व्यक्तिरेखेत एक सौंदर्यपूर्ण निर्मितीचे तत्त्व दडलेले आहे. ती सजीवांना रंग बहाल करते. कुहूच्या सांगण्यावरून सृष्टीरचनेत कुहूचा माणूस करून थोडाफार हस्तक्षेपही करते. पण सृष्टीच्या निर्मितितत्त्वात संहारावर मात करणारा एक आश्वस्त सूरही आहे. वानर डाक्टरांचा दवाखाना आणि त्यांचे रुग्ण, चोचीला बँडेज बांधल्यामुळे बोबडं बोलणारा सुतारपक्षी, डोंगरी मैना, नाजुका फुलपाखरू या व्यक्तिरेखा कथानक पुढे नेण्यापेक्षा जंगलाच्या वातावरणाला अधिक रंजक करतात. त्यात एक प्रकारचा निसर्गदत्त निरागसपणा आहे. लुईस करालच्या "एलिस इन वंडरलँड" किंवा रूडयार्ड किपिलंगच्या "जंगलबुक" मधील पात्रांची आठवण करून देणारा.
कविता महाजन यांनी कुहूची कथा लिहिताना मानवी वर्तनावर, त्याच्या सरड्याप्रमाणे रंग बदलण्याच्या वृत्तीवर, आपला कायदा इतरांवर लादण्याच्या बळजोरीवर, तुच्छतावादी वृत्तीवर आणि निसर्गाला पुस्तकी दृष्टिकोनात बंदिस्त करून खर्‍या निसर्गाला पारखे होण्याच्या विनाशकारी दुर्बुद्धीवर पशूपक्ष्यांच्या तोंडून वेळोवेळी भाष्य करण्याची संधी साधली आहे. या कथेची नायिका मानुषी ही आत्मसंतुष्ट, कुहूसारख्यांच्या निरपेक्ष प्रेमाची कदर नसलेली, शहरी जीवनातले अग्रक्रम जोपासणारी स्त्री आहे. आजच्या माणसाचे ती प्रतिनिधित्व करते.
प्रवास हे असंच या कथेतलं आणखी एक सूत्र आहे. कुहूच्या प्रवासाचं वर्णन येतं ते असं - जाताना त्याला कितीतरी प्राणी दिसले. नवे नवे स्थलांतर करून येणारे पक्षी भेटले. भेटणार्‍या प्रत्येकाच्या गोष्टी ऐकून एक मोठी लायब्ररीच त्याच्या डोक्यात तयार झाली. नद्या, तलाव, डोंगर, दर्‍या पाहून सृष्टीनं निर्माण केलेल्या वेगवेगळया गोष्टींचं नवल कुहूच्या मनात मावेनासं झालं. इकडे सृष्टी आपल्या कामात मग्न होती. ती आपल्या जीवसृष्टीतल्या बिघडलेल्या गोष्टी दुरुस्त करत होती. तर काही पशू-पक्ष्यांमध्ये, झाडाझुडपांमध्ये, माणसांमध्ये नव्या सुधारणा घडवून या जीवांना अधिक योग्य, अधिक चांगलं कसं बनवता येईल याबाबतही तिचे पुष्कळ प्रयोग सुरू होते. या प्रवासाचं फलित सांगणारं पुढचं वाक्य महत्त्वाचं आहे, "कुहू जेव्हा सृष्टीच्या चित्रशाळेजवळ पोहोचला, तेव्हापर्यंत त्याला पुष्कळ गोष्टी करता येऊ लागल्या होत्या. तो एक हुशार पक्षी बनला होता." या प्रवासात नैसर्गिक पर्यावरण व्यवस्थेचा, इको सिस्टीमचा आजचा दृष्टिकोण नकळतपणे आलेला आहे. स्थलांतरीत पक्षी, लायब्ररी यातून सूचित होणारा निसर्गाचा अभ्यास वेगवेगळ्या शब्दांतून व्यक्त होणारी जैवविविधता, गोष्टीचं नवल - सेन्स ऑफ वंडर - सृष्टी साधत असलेला जैविक विकास अथवा डार्विनिझम हे सारं अप्रत्यक्षपणे या प्रवासात आलेलं आहे.
या पुस्तकातलं सृष्टीचं प्रारूप परीकथेतल्या देवतेपेक्षा पृथ्वी हीच एक सजीव गोष्ट आहे असं मानणार्‍या जेम्स लव्हलाकच्या 'गाया' ( Gaia)  संकल्पनेशी मिळतंजुळतं आहे. कुहूचा आणखी एक प्रवास आहे. तो म्हणजे कुहूचं माणूस होणं आणि पुन्हा पक्षी होण्याचे दरवाजे बंद होणं - पक्ष्यांचं जग आणि माणसांचं जग आणि या दोन्ही जगांमधले विरोधाभास दूर करून सृष्टीच्या एकात्म, सुंदर अनुभवासाठी प्रयत्नशील राहणं असा हा आत्मिक प्रवास आहे. तो कुहूच्या कथेला रंजनात्मक परीकथेपेक्षा अधिक उंचीवर नेऊन ठेवतो.
भाषा हे या कथेचं आणखी एक सूत्र. भाषा अनेक प्रकारची असते. शब्दांची, भावनांची आणि भाषिक अडसरही अनेक असतात. भाषा भावना व्यक्त करण्यासाठी वापरतात तशीच ती भावना लपवण्यासाठी सुद्धा वापरतात. भाषिक संवाद हा फक्त एक प्रकारचा संवाद असतो. भाषेने सर्व प्रश्न सुटतातच असं नाही. कुहूचं गाणं ही सुद्धा त्याची एक भाषाच आहे. माणसांची भाषा शिकू इचिछणार्‍या कुहूला मैना सांगते, "माणसाच्या अनेक भाषा आहेत. आपलीच भाषा श्रेष्ठ असं त्यांना वाटत असतं. बोलीभाषेत बोलणारी माणसं गावंढळ आहेत असं ते समजतात. माणसांच्या उच्चारावरून त्यांना जोखलं जातं. बोबडं आणि तोतरं बोलणार्‍यांना लोक हसतात." सगळे भाषिक पूर्वग्रह मैनेच्या या बोलण्यात आलेले आहेत. कुहू माणसांची भाषा शिकतो खरा पण त्यातली वैय्यर्थता त्याला कळून चुकते. भाषेतून प्रेम सांगता येतं पण एखाद्याच्या मनात प्रेम निर्माण करायला भाषा अगदीच निरुपयोगी आहे, हे त्याला पटतं. पक्ष्यांच्या इवल्याशा मेंदूतील नैसर्गिक ऊर्मीना माणसाच्या बुद्धीची जोड देऊन त्याला नवी भाषा घडवायची आहे, विकास साधायचा आहे. निराश होऊन कुहू जंगलात परत येतो तेव्हा निरुपयोगी ठरलेले माणसांचे शब्द एका सागाच्या मोठ्या पानात बांधतो आणि घुबडआजोबांजवळ झाडाच्या ढोलीत ठेवून देतो. या हृदयीचं त्या हृदयी आपोआप पोचणारं विशुद्ध संगीत हीच खरी हृदयाची भाषा, बाकी सार्‍या भाषा एकरूपता साधण्याऐवजी बुद्धीभेदच करतात असाच काहीसा संदेश कुहूच्या भाषापुराणातून मिळतो.
कुहूचं माणसात रूपांतर म्हणजे एक प्रकारे स्वत:चा पक्षीधर्म सोडून मनुष्यधर्म स्वीकारण्यासारखंच होतं. इतर पशुपक्ष्यांनी असा वेडेपणा न करण्याचा सल्ला दिला पण तो कुहूला पटला नाही. आपण कितीही उदात्त भावनेने दुसर्‍याशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला तरी दुसरे आपल्याला स्वीकारतातच असं नाही. कारण स्वार्थाने ते आंधळे झालेले असतात. अहंकार आणि पूर्वग्रह आड येतात. कुहूचं तसंच झालं. त्यासाठी त्याला गाण्याची किंमत मोजावी लागली. आणि परतीच्या वाटाही बंद झाल्या. तो स्वधर्माला पारखा झाला आणि दुसर्‍या धर्माने त्याला स्वीकारलं नाही. कोयल म्हणूनच निष्कर्ष काढते की, "पक्ष्यांनी कधीही माणसाच्या प्रेमात पडू नये आणि माणूस होण्याचा खुळेपणा तर कधीच करू नये. पक्ष्यांनी पक्षीच राहावं आणि पक्ष्यांसोबतच राहावं. माणसांच्या नादी लागून आपले पंख आणि गाणं गमावून बसू नये."
माणसाने आपला विनाशी अहंकार सोडून सृष्टीच्या विकसनशील प्रेमभावनेशी, कुहूच्या जीवनगाण्याशी नव्याने नातं जोडावं अशी पर्यावरणविषयक नैतिक भूमिका इथे मांडलेली आहे.
कुहूच्या शब्दरूपाचा विचार केल्यानंतर त्याच्या नव्या घाटाचा, मल्टीमीडिया कादंबरीच्या यशापशाचा मागोवा घेणे इष्ट ठरेल. मल्टीमीडिया अशी त्याची जाहिरात केल्याने वाचकांच्या अपेक्षा खूप उंचावलेल्या होत्या. ज्यामध्ये व्हिडिओ, ऑडिओ, प्रिंट अशा माध्यमांचा वापर केलेला आहे ती मल्टीमीडिया कादंबरी एवढीच व्याख्या असेल तर ही तशी कादंबरी आहे. पण कलात्मक एकत्रित परिणाम साधणारी, इतर कोणत्याही प्रचलित माध्यमांपासून काहीतरी पूर्णपणे वेगळा अनुभव देणारी अशी ही कादंबरी आहे का? तर तशी ही कादंबरी नाही असंच म्हणावं लागतं. फार तर ती दृश्यमाध्यमाचा, कथाचित्रांचा मुक्त वापर केलेली एक चित्रमय कथा आहे आणि एका विवक्षित पातळीवरचा संवाद साधण्यात ती यशस्वी झाली आहे एवढंच. मल्टीमीडिया हा शब्द आज रूढ झालेला आहे. पण याची चाहूल मार्शल मकलुहानच्या "मीडियम इज द मेसेज" आणि "द गटेनबर्ग गलक्सी" या पुस्तकांद्वारे १९६०च्या दशकातच लागलेली होती. चित्रपट आणि व्हिडिओ यांनी दृश्यभाषेवरच नव्हे तर ग्रांथिक भाषेवरही आपला प्रभाव पाडला आणि एकविसाव्या शतकात अनुभव विविध दृकश्राव्य माध्यमांमधून एकत्रितपणे घेणं हा वास्तव अनुभव बनला. इंटरअ‍ॅक्टिव्ह व्हिडिओ गेम्स हा त्याचा आणखी एक विस्तार. व्हिडिओ गेम्स आणि ग्राफिक नॉव्हेल्स यांचा इतिहास गेल्या पंचवीस वर्षांचा आहे. दृश्यकलेत मांडणशिल्पे आणि त्यातही व्हिडिओ इन्स्टालेशन्समधून मल्टी मीडिया प्रस्थापित झाला. यातून जी एक नवी संवेदनशीलता निर्माण झाली त्यात 'कुहू' कुठे बसते? मराठी वाचकांना मल्टीमीडियाची ही पार्श्वभूमी फारशी परिचित नाही. त्यामुळे 'कुहू' वाचून, पाहून आणि ऐकून मल्टीमीडियाबद्दल वाचकांची काही वेगळी समजूत होण्याची शक्यता आहे. काहींना तिच्या प्रयोगशीलतेचं अप्रूप वाटेल तर काहींना तो एक व्यर्थ खटाटोप वाटेल. पण चित्रमय कादंबरी म्हणून तिच्याकडे बघितलं तर 'कुहू'मधल्या जमेच्या बाजू दिसतील.
या कादंबरीतील वर्णनं पाहिली तर ती दृष्य अनुभवाला अधिक जवळची आहेत. वार्षिक उत्सवासाठी जमलेल्या पक्ष्यांचे रंग. हिरव्यागार पानोळया, निळं आकाश, कैर्‍यांचे घोस, केशरी आंब्यांमध्ये होणारं त्यांचं रूपांतर. आभाळभर हिरव्यागार पोपटांचा थवा. सरकत जाणार्‍या ढगांच्या सावल्या. कुहू माणूस होतानाचा लालबुंद आक्रोश. प्रकाशाची प्रसन्न रेषा. अशी अनेक उदाहरणं देता येतील. या वर्णनांमधला आशय सोबतच्या अर्थपूर्ण चित्रांमुळे अधिक गडद होतो. चित्रघटकांची रचना, पोत आणि रंग यांचा परिणामकारक वापर कविता महाजन यांनी केलेला आहे. कुहू झाडावरून उडता उडता खाली पडतो तेव्हाची त्याची भयभीत अवस्था, लाल विटकरी रंगाच्या पार्श्वभूमीवर झाडांच्या काळया सावल्या आणि 'आई....' ही आर्त हाक मोठ्या अक्षरांमध्ये दाखवून नाट्यपूर्ण परिणाम साधला आहे. रितेपणाचं काहूर दर्शवणारं निळंभोर आकाश हे आणखी एक असंच परिणामकारक उदाहरण. कधीकधी काही पानांवर पशुपक्ष्यांच्या चित्रांपेक्षा अमूर्त आकार आणि रंगसंगतीतून, योग्य तिथे काळया करड्या रंगछटा वापरून कुहूच्या भावस्थितीचं नेमकं चित्र उभं केलं आहे. पशुपक्ष्यांच्या व्यक्तिरेखांचा उल्लेख यापूर्वी केलाच आहे. घुबडआजोबा, कोतवाल सर, भिंगार सरडा यांना चित्रांमध्ये वास्तववादी शैलीतच चितारलं आहे. कार्टून्समध्ये जसं एक वेगळं व्यक्तिमत्व दिलेलं असतं तसं इथे केलेलं नाही. कारण पुस्तकाच्या एकूण चित्रवृतीशी ते विसंगत ठरलं असतं. पुस्तकात अधूनमधून कविता येतात. त्यांच्यासाठी सुलेखनशैलीचा म्हणजेच कॅलिग्राफीचा वापर केलेला आहे. पण आकर्षक मांडणीपलीकडे ही कॅलिग्राफी फारशी जात नाही.
पुस्तकाबरोबर सीडी दिलेली आहे. आवाज आणि संगीताची एक नवी मिती त्यामुळे मुद्रित कथेला लाभते. पण तशा पुस्तक आणि सीडी या दोन्ही गोष्टी स्वतंत्रच राहतात. आपल्याकडे रंगीत चित्रे असलेली लहान मुलांची भरपूर पुस्तके प्रकाशित होतात. पण लेखकाइतकीच प्रतिष्ठा कथाचित्रकाराला किंवा इलस्ट्रेटरला मिळत नाही. लेखनाइतकीच अभिजात दर्जाची निर्मिती कथाचित्रकार करू शकतो याची जाणीवच इथे रुजलेली नाही. पाश्चात्त्य देशातील अलन फ्लेचरचं "द आर्ट ऑफ लुकिंग साईडवेज" किंवा लिआन लिओन्नीची मुलांसाठी चित्रित केलेली पुस्तकं अशी अनेक उदाहरणं देता येतील. चित्रांमध्ये आकर्षकतेच्या पलीकडे असलेली आशय आणि अनुभव व्यक्त करण्याची ताकद अमर्याद असते. कविता महाजन यांच्या पुस्तकामध्ये कथाचित्रकलेच्या मर्यादा ओलांडून दृश्य अनुभव घेण्याची आणि दुसर्‍यांना देण्याची ऊर्मी प्रकर्षाने जाणवते आणि त्यात त्यांना मिळालेलं यशही कमी महत्त्वाचं नाही. अशी एक बहुआयामी संवेदनशीलता इथे रुजली तर उद्या खर्‍या अर्थाने मल्टीमीडिया कादंबरी निर्माण होईलही.  

No comments: